शहापूर : गेल्या आठवडाभरात शहापूर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे .त्यात दोन दिवसापासून तालुक्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे .नुकतेच वीटभट्टीचा हंगाम सुरू झाला असून त्यावर ही या पावसाचा प्रभाव जाणवणार आहे.
तालुक्यात प्रामुख्याने काकडी, भेंडीसह इतर भाजीपाला लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत सुरू होते .त्यासोबत शेवगा, आंबा, चिकू, केली बागायतीची संख्या वाढते आहे .नव्यानेच तालुक्यात बागायती व्यावसायाला चालना मिळत असताना या ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे . या वातावरणाचा प्रभाव आरोग्यावर ही जाणवत असून विषाणुजन्य आजारांच्या प्रमाणांत वाढ झाली आहे.
डिसेंबर महिन्यात थंडीच्या वातावरणात ढगाळ वातावरणामुळे कोरड्या वाऱ्यामुळे हवा दूषित होते .याचा परिणाम आरोग्यावर होऊन दूषित हवामानामुळे विषाणुजन्य आजार पसरले आहेत .एकीकडे कोरोनाची भीती असताना दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याने भीतीचे वातावरण आहे .चालू वर्षी पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले असतानाच उन्हाळी शेती, भाजीपाला व फलबागायतदार शेतकऱ्यांवर मोठे संकट उद्भवले आहे.