श्री पांडुरंग कारखान्याची संपूर्ण (१४.४२) कोटीची राहीलेली सर्व रक्कम शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग!

जनदूत टिम    11-Oct-2020
Total Views |
सोलापूर : कारखान्याने गाळप हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या ऊसाची संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम आज रोजी बँकेत वर्ग केली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण र.रु.१४.४२ कोटी जमा केली आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
 
Yashwant Kulkarni_1 
 
कारखान्याचा दि. ८/१०/२०२० रोजीचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे कैवारी, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या अनुपस्थित भावनिक वातावरणात झाला होता. त्यावेळी मोठे मालकांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारे कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उर्वरीत एफ.आर.पी. ची देय असणारी रक्कम रु. २०६/- प्रती मे. टन प्रमाणे दोन दिवसात देणार असलेचे जाहिर केले होते. त्यानुसार कारखान्याने आज रोजी गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ७,००,१०० मे. टन ऊसाचे प्रती मे. टन रु. २०६/- प्रमाणे र.रु.१४.४२ कोटी रक्कम बँकेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्यास पुरवठा केलेल्या ऊसास शासनाने जाहीर केलेल्या संपूर्ण एफ. आर .पी. ची प्रती मे. टन र.रु. २,५०६/- प्रमाणे रक्कम अदा केली आहे. त्याप्रमाणे जिल्हया मध्ये संपूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम अदा करणारा श्री पांडुरंग हा कारखाना पहिला ठरलेला आहे.
 
गळीत हंगाम २०२०-२१ सुरु करणेचे दृष्टीने कारखान्यामधील कामे पूर्ण झालेली असून गाळप हंगाम दि. १५/१०/२०२० पासून सुरु केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वहातुक यंत्रणा सक्षमपणे उभारली असून त्यांना ऍ़डव्हान्स हप्त्याचे वाटपही पुर्ण केलेले आहे. या हंगामात कारखान्याकडे सुमारे १२ लाख मे. टन ऊसाच्या नोंदी असून त्यांचे गाळप कारखाना वेळेवर करणार आहे अशी माहिती कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी साहेब यांनी दिली.