'सौरव गांगुली भारताच्या निवड समितीमध्ये करणार 'हे' बदल'

जनदूत टिम    25-Nov-2019
Total Views |
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. बीसीसीआयचे अध्यक्षपद भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे आल्यावर बरेच चांगले बदल पाहायला मिळाले. पण तरीही भारताच्या निवड समितीवर कुणी ना कुणी तरी टीका करत असतं. त्यामुळे आता निवड समितीमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले जाते.

विश्वचषकाच्यावेळी भारताच्या निवड समितीचे सदस्य विराट कोहलीच्या पत्नीचे चहाचे कप उचलत होते, अशी टीका माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केली होती. महेंद्रसिंग धोनीबाबत वक्तव्य केल्यानंतर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना चाहत्यांनी चांगलेच धारेवर धले होते. त्याचबरोबर निवड समिती सदस्य हे कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हातातील बाहुले आहेत, अशीही टीका होत असते. त्यामुळे आता निवड समितीमध्ये वजनदार व्यक्ती यायला हवी आणि गांगुली ही गोष्ट नक्कीच करेल, असा विश्वास फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केला आहे.
 

संजू सॅमसनला न खेळवता संघातून काढल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटला हरभजनने उत्तर दिले आहे. याबाबत हरभजन म्हणाला की, " निवड समिती संजूची परीक्षा पाहत असावी. पण निवड समितीमध्ये बदल करण्याची गरज आहे. कोणीतरी मजबूत व्यक्ती या पदासाठी असायला हवी. मला विश्वास आहे की, गांगुली नक्कीच योग्य बदल करेल."