मी हरवलो नाही : राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची माहिती

जनदूत टिम    25-Nov-2019
Total Views |
मुंबई : मी हरवलो ही नाही किंवा माझे अपहरणही झाले नाही. मी दिल्लीतील हॉटेलमध्ये मी पोहोचलो, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे 100 ते 200 त्यावेळी तेथे उपस्थित होते. खूप मोठ्या संख्येने साध्या वेशातील पोलिस उपस्थित होते, त्यामुळे आम्ही घाबरलो होतो, असे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले.


 
आम्ही शरद पवार यांना सांगितले की आम्हाला परत यायचं आहे. आणि पक्षासोबत रहायचं आहे. त्यांनी परत आणण्याची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. पटेल यांच्यासोबत आमदार दौलत दरोडा होते. त्या दोघांना घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दूहन रविवारी रात्री मुंबईला परतले. नितीन पवार हेही मुंबईला परतले असून नरहरी झीरवळ दिल्लीत सुरक्षित ठिकाणी आहेत. त्यांना योग्य वेळी मुंबईत आणण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
 
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसला 52 आमदरांचा पाठींबा आहे, तर अन्य एक जण आमच्या संपर्कात आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना हॉटेल हयातमध्ये हलवण्यात आले आहे. शनिवारी पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी रात्री उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील असे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा भारतीय जनता पक्षाला असल्याचे पत्र राज्यपालांनमा दिले. त्यानंतर पहाटे दोघांचा शपथविधी झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.